top of page

राम का पूजला जातो?

*रामनवमीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!*

राम पूजला जातो कारण त्याच्या आयुष्यात प्रश्न नव्हते म्हणून नाही, तर प्रश्नांच्या ज्वाळांतही त्याने सत्यनिष्ठा, संतुलन, कर्तव्यबुद्धी, मर्यादा आणि चारित्र्य जपले म्हणून. प्रारब्धाने प्रसंग घडवले असतील, पण त्या प्रसंगांना दिलेले त्याचे उत्तर हा पुरुषार्थ होता. म्हणूनच राम आपल्याला शिकवतो — समस्या प्रत्येकाच्या जीवनात असतात; प्रश्न एवढाच असतो की आपण समस्येचा भाग होतो की समाधानाचा.

श्रीराम जय राम जय जय राम

विस्तृत लेख ✍🏼👇🏼


*राम का पूजला जातो?*

कारण त्याच्या आयुष्यात प्रश्न नव्हते म्हणून नाही… तर प्रश्नांच्या ज्वाळांतही तो संतुलित राहिला म्हणून

रामनवमी आली की आपण भक्तिभावाने *जय श्रीराम* म्हणतो.

भारतातील जवळजवळ प्रत्येक प्रांतात आणि अनेक परदेशांमध्येही रामाचे पूजन केले जाते.

मग एक प्रश्न सहज मनात येतो —

राम सर्वत्र इतका पूजला जातो, ते का?

तो देव होता म्हणून?

तो राजा होता म्हणून?

रावणाचा पराभव केला म्हणून?

की आयुष्यातील भीषण प्रसंगांच्या वादळातही त्याने अंतर्मनाचे संतुलन, मर्यादा आणि सत्यनिष्ठा जपली म्हणून?

श्रीराम जय राम जय जय राम।


रामाचे जीवन जरा थांबून पाहिले, तर ते एखाद्या सुखमय, सरळ, विजयी जीवनाची कथा वाटत नाही.

उलट, ते एकामागून एक कठीण प्रसंगांनी वेढलेले आयुष्य दिसते.


राज्याभिषेकाच्या उंबरठ्यावर वनवास.

वनवासात पत्नीचे अपहरण.

पत्नीच्या सुटकेसाठी युद्ध.

युद्ध जिंकूनही लोकनिंदेचा आघात.

गर्भवती पत्नीचा- सीतेचा विरह.

अज्ञानात स्वतःच्या मुलांशी संघर्ष.

आणि शेवटी सीतेचा कायमचा विलय.


हे जर एखाद्या सामान्य माणसाच्या जीवनात घडले असते,

तर कदाचित लोक म्हणाले असते —

*किती दुर्दैवी आयुष्य!*

*किती संकटांनी वेढलेला मनुष्य!*

*काय मिळाले त्याला आयुष्यभर?*


मग अशा व्यक्तीची पूजा का?


याचे उत्तर रामाच्या आयुष्यात काय घडले यात नाही.

तर जे काही घडले, त्याला तो कसा समोरा गेला यात आहे.


रामाची महानता घटनांत नाही;

ती रामाच्या घटनांच्या प्रतिसादात आहे.


सद्गुरू श्री वामनराव पै एक अत्यंत मर्मभेदी गोष्ट सांगतात,

*समस्या आणि प्रश्न प्रत्येकाच्या जीवनात असतात. प्रश्न एवढाच असतो की, तुम्ही प्रश्नांकडे कसे पाहता? तुम्ही समस्या सोडविण्याचा भाग बनता, की समस्या आणखी चिघळविता?*


रामाचे संपूर्ण जीवन या एका वाक्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.


त्याच्या आयुष्यात प्रश्न नव्हते असे नाही.

उलट, त्याच्या वाट्याला आलेले प्रश्न असामान्य होते.

पण त्याने त्या प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी ठेवली.


कोणत्याही प्रसंगी तो कटु झाला नाही.

तो सूडाने पेटला नाही.

तो तक्रारीत गुरफटला नाही.

तो स्वतःच्या वेदनेत इतका अडकला नाही की विवेक हरपला.


तो जणू प्रत्येक प्रसंगी स्वतःला एकच प्रश्न विचारत राहिला,

*या प्रसंगात माझे कर्तव्य काय?*

*या वेदनेतही सत्याशी प्रामाणिक कसे राहायचे?*


आणि म्हणूनच रामाची कथा केवळ पौराणिक घटना राहत नाही;

ती जीवनकलेचा जिवंत धडा बनते.


सद्गुरू श्री वामनराव पै म्हणतात —

*वस्तुस्थितीचा स्वीकार करून परिस्थितीला योग्य वळण देण्यातच शहाणपण असते.*


रामाचे जीवन जणू या एका सूत्राचे साकार रूप आहे.


वनवास आला — त्याने वस्तुस्थिती स्वीकारली.

पण तो निष्क्रिय बसला नाही.

सीता हरपली — त्याने दुःख स्वीकारले.

पण शोधाचा पुरुषार्थ सोडला नाही.

युद्ध अपरिहार्य झाले — तो कर्तव्यापासून पळाला नाही.

लोकनिंदा झाली — त्याच्या अंतरंगाला वेदना झाल्या; पण तो वैयक्तिक वेदनेतच बुडून राहिला नाही.

जीवनाचे धागे सुटत गेले, तरी त्याने अंतर्मनाचे संतुलन तुटू दिले नाही.


स्वीकार म्हणजे हार नाही.

स्वीकार म्हणजे निष्क्रियता नाही.

स्वीकार म्हणजे वास्तवाकडे डोळे उघडून पाहणे.

आणि नंतर — जिथे शक्य आहे तिथे परिस्थितीला योग्य वळण देण्यासाठी पुरुषार्थ करणे.


रामात हे दोन्ही एकत्र दिसतात

*स्वीकार आणि पुरुषार्थ*

*वेदना आणि विवेक*

*कर्तव्य आणि करुणा*

*मर्यादा आणि माणुसकी*


भारतीय संस्कृतीत अनेक दैवी रूपे पूजली जातात.

कृष्ण योगेश्वर म्हणून मोहवतात.

शिव विरक्त महायोगी म्हणून थक्क करतात.

बुद्ध करुणा आणि प्रज्ञेच्या तेजाने मार्ग दाखवतात.


पण श्रीरामांचे एक वैशिष्ट्य विशेष ठळकपणे जाणवते —

ते केवळ अवतार नव्हते; ते राजा होते.


ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे.


कारण रामाच्या जीवनातील अनेक निर्णय केवळ वैयक्तिक नव्हते.

त्यामागे राज्यकर्त्याची जबाबदारी होती.

लोकधर्माची छाया होती.

राजधर्माची कठोरता होती.

मर्यादेची किंमत होती.


म्हणूनच रामाचे आयुष्य हे फक्त एका भक्ताचे, पुत्राचे, पतीचे किंवा योद्ध्याचे आयुष्य नाही;

ते एका राज्यकर्त्याचे आयुष्य आहे.

आणि म्हणूनच त्याच्या प्रत्येक निर्णयामागची वेदना अधिक गहिरी आहे.


राम मनाला भिडतो, कारण तो आपल्याला जीवनाच्या मध्यावर भेटतो —

नात्यांच्या वेदनेत,

कर्तव्याच्या संघर्षात,

अन्यायाच्या प्रसंगात,

लोकांच्या मतांच्या दबावात,

आणि अंतर्मन तुटत असतानाही संतुलन कसे जपायचे, या कठीण प्रश्नात.


म्हणूनच भारतीय मनाने आदर्श शासनाला *रामराज्य* हेच नाव दिले.


आजच्या जगात आपण एखाद्या व्यक्तीचे मोठेपण त्याच्या यशाने, सत्तेने, संपत्तीने, प्रभावाने आणि लोकप्रियतेने मोजतो.

पण भारतीय संस्कृतीने वेगळीच कसोटी जपली.


इथे पूजनीय तो नाही ज्याच्या आयुष्यात काहीच बिघडले नाही.

इथे पूजनीय तो —

ज्याने बिघडलेल्या परिस्थितीतही अंतर्मनाची उंची जपली.


रामाची पूजा त्याच्या राज्यासाठी नाही.

त्याच्या विजयासाठीही नाही.

तर विपरीत परिस्थितीतही सत्यनिष्ठा, संतुलन, कर्तव्यबुद्धी आणि मर्यादा न सोडण्यासाठी आहे.


इथे एक अधिक खोल प्रश्न उभा राहतो —

रामाचे जीवन हे नशीब होते? दैव होते? प्रारब्ध होते?


कदाचित या तिन्हींचा काही भाग असेल.


वनवास त्याच्या इच्छेने आलेला नव्हता.

सीतेचे अपहरण त्याने घडवले नव्हते.

लोकनिंदेचे वादळ त्याने उठवले नव्हते.

जीवनातील अनेक प्रसंग त्याच्या नियंत्रणाबाहेरचे होते.


म्हणून आपण त्याला दैव म्हणू शकतो.

प्रारब्ध म्हणू शकतो.

नशीब म्हणू शकतो.


पण रामाला मर्यादा पुरुषोत्तम बनवणारे त्याचे प्रारब्ध नव्हते.

त्याला त्या उंचीवर नेणारा त्याचा पुरुषार्थ होता.


घटना कदाचित प्रारब्धाने घडवल्या.

पण त्या घटनांना संतुलन, मर्यादा, सत्यनिष्ठा आणि कर्तव्यबुद्धीने उत्तर देणे —

हा त्याचा पुरुषार्थ होता.


यासाठीच सद्गुरूंचे महान जीवनसूत्र येथे फार खोल अर्थाने उलगडते —

*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.*


या वाक्याचा अर्थ असा नाही की जीवनातील प्रत्येक घटना आपण ठरवतो.

तसे नसते.

जीवनात बरेच काही आपल्या हातात नसते.

प्रारब्ध, परिस्थिती, समाज, संबंध, काळ, इतरांचे निर्णय — हे सारे आपला वाटा घेऊन येतात.


पण जे आपल्या हातात असते ते अधिक महत्त्वाचे असते —

त्या प्रसंगात आपण कोण होतो.


म्हणूनच म्हणावेसे वाटते —


*तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार;*

प्रारब्ध दगड देतो,

पण मूर्ती घडवतो तो पुरुषार्थ.


आणि त्या पुरुषार्थातूनच घडते चारित्र्य.


रामाने हेच करून दाखवले.


त्याने प्रत्येक परिस्थिती जिंकली असे नाही.

जीवनात बरेच काही त्याच्या मनासारखे घडले नाही.

पण त्याने स्वतःला हरवू दिले नाही.

त्याने आपल्या चारित्र्याला तडा जाऊ दिला नाही.


हे जिंकणे अधिक मोठे नाही का?


कारण बाह्य विजय परिस्थितीवर अवलंबून असतो.

अंतर्गत विजय चारित्र्यावर अवलंबून असतो.


राम म्हणूनच पूजनीय ठरतो.


तो आपल्याला संकटमुक्त जीवनाचे आश्वासन देत नाही.

तो आपल्याला सांगतो —

प्रश्न येतील. वेदना येतील. गैरसमज होतील. अपेक्षाभंग होईल. बरेच काही हातातून निसटेल. पण त्या सगळ्यातही तू स्वतःला हरवू नकोस.


आज आपल्याला वनवास नसतील.

रावणाशी युद्ध नसतील.

अयोध्येचे प्रश्न नसतील.


पण आपल्या आयुष्यात प्रश्न नाहीत का?


अपेक्षाभंग,

नात्यांतील वेदना,

आर्थिक ताण,

मानसिक संघर्ष,

आरोग्याची चिंता,

मानहानी,

अन्याय,

एकटेपणा,

असुरक्षितता.


प्रश्न बदलले आहेत.

पण माणसाची कसोटी बदललेली नाही.


आजही खरा प्रश्न हा नाही की

“माझ्या आयुष्यात समस्या का आहेत?”


खरा प्रश्न हा आहे —

“मी त्या समस्यांपुढे कोण होतो आहे?” मी समस्यांकडे कोणत्या दृष्टीने बघतोय.


मी तक्रार होतो आहे की उत्तर?

मी कटु होतो आहे की करुणावंत?

मी परिस्थिती चिघळवतो आहे की तिला योग्य वळण देतो आहे?

मी समस्येचा भाग होतो आहे की समाधानाचा?


रामाचे जीवन आपल्याला हेच शिकवते —


प्रारब्ध परिस्थिती घडवते;

पुरुषार्थ चारित्र्य घडवतो.


रामाच्या जीवनात प्रश्न होते.

मोठे होते.

वेदनेचे होते.

मन विदीर्ण करणारे होते.


पण तो प्रश्नचिन्ह बनला नाही.

तो उत्तराचा भाग झाला.


आणि म्हणूनच तो पूजनीय झाला.


रामनवमी म्हणूनच केवळ उत्सव नाही.

तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे.

स्वतःला विचारण्याचा दिवस आहे.


माझ्या जीवनात प्रश्न आले, तर मी कोसळणार की उभा राहणार?

मी परिस्थितीला दोष देत बसणार की तिला योग्य वळण देण्याचा पुरुषार्थ करणार?

मी माझ्या वेदनेला कटुता बनवणार की करुणा?

मी माझे संतुलन जपणार का?

मी माझ्या चारित्र्याला तडा जाऊ देणार का?


कदाचित रामनवमीची खरी प्रार्थना ही अशी असावी —


“हे प्रभू श्रीराम,

माझ्या जीवनातून प्रश्न दूर कर असे मी मागत नाही .

पण प्रश्नांसमोर मी छोटा पडू नये.

मला असंतुलित नको करू.

मला कटु बनवू नको.

मला समस्येचा भाग बनवू नको.

मला विवेक दे.

मला सत्यनिष्ठा दे.

मला करुणा दे.

मला संतुलन दे.

मला चांगली बुद्धी दे.

आणि माझे चारित्र्य अबाधित ठेवण्याचे बळ दे.

जेणेकरून मी उत्तराचा भाग बनू शकेन.”


यातच राम आहे.

यातच रामनामाची शक्ती आहे.

यातच जीवनकलेचे गूढ आहे.


या रामनवमीच्या मंगल दिवशी

आपल्या सर्वांच्या अंतर्मनात

मर्यादा जागी होवो,

सत्यनिष्ठा दृढ होवो,

कर्तव्यबुद्धी प्रगल्भ होवो,

चारित्र्य तेजस्वी होवो,

आणि प्रश्नांच्या अंधारातही संतुलनाचा दिवा अखंड तेवत राहो —

हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना.


श्रीराम जय राम जय जय राम।

श्रीराम जय राम जय जय राम।


रामनवमी एक चिंतन:

*जयंत जोशी*

 
 
 

Comments


Quick LInks

Contact us:

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube

Phone:  +91 7843007413 

Address: First floor, Rathi Chambers, Above Yamaha service Centre,  GPO Road, Khadkali Signal, Ganjmal, Nashik - 422001

bottom of page